आमच्या प्रेरणेचे उगमस्थान : भूषण कटककरांची गझल "विरहानंतर"
डेस्सर्ट असते, हे जेवण संपवल्यानंतर
खातो आहे, तुम्ही तुमचे ठरवा नंतर
"कसे बनवले आहे?" म्हणते पुढे येउनी
बोलवेचना मला तोबरे भरल्यानंतर
हवेत जाताना प्रश्नाचे उत्तर कळले
काय भरावे पेल्यामध्ये सोड्यानंतर...
किती जिलेब्या उदरी होत्या उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रेच्यानंतर
तुझ्या विचारांमध्येच व्यत्यय तुझ्याच भगिनी
असेच होते लग्न एकिशी झाल्यानंतर
उपास नसता खाउन घ्यावे गुलाबजामुन
रसगुल्ले थोडे मटकावे त्यांच्यानंतर?
काय घालता भीती खाताना वजनाची?
बोला डायटवाल्यांनो...पण खाल्ल्यानंतर
त्याच्याइतके वाइट नाही अपचन ’खोड्या’
जे होते पोटामध्ये...कलकलल्यानंतर
Labels: विडंबन
प्रदीप कुलकर्णी यांची गझल ..समाधी! हिस वंदन करून आम्हीही समाधिस्त झालो. (ही बातमी ऐकून जालावरील आमच्या काही कविमित्रांना हर्षवायू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. असो.)
...................................
(...समाधी!)
...................................
खाऊन मुगाचा भात...निघालो आहे!
पाडून दुधाचे दात...निघालो आहे!
सामान, वळकटी आणि भरीला जाया...
घेऊन मुले मी सात निघालो आहे!
असतात दिवाणे कोण तुझ्या गे मागे?
मी खार तयांवर खात निघालो आहे!
रंगात उना, सानी मिसरा रंगवितो...
मी चित्रकला-निष्णात निघालो आहे!
माझे न कधी भिडणार सुराला गाणे...
मी वर्ज्य स्वरांनी गात निघालो आहे!
भांडेन जिथे जाईन तिथे मी; नंतर -
-होईल पुन्हा रुजवात...निघालो आहे!
घेईन समाधी, खूप विडंबन केले...
सोलून कवींची कात निघालो आहे!
- खोडसाळ
................................
रचनाकाल ः २९ मे २००९
.................................
Labels: विडंबन
प्रेरणा : पाहून वादळाला झाला पसार नाही
लावून वाद झाला मागे पसार नाही
अन् कोणत्या शिव्या तो देण्या तयार नाही ?
गेलो अनेक पोरी घेऊन थेटराला
काळोख किर्र होण्या काही तयार नाही
मी रोज तिज पाहावे दीपावलीप्रमाणे
आहे फटाकडी ती, ती वायबार नाही
उंची नसे हृतिकची, सलमानची न छाती
लुब्र्यास कोण सांगे, तो डौलदार नाही ?
शब्दांत रंग भरतो जो भाव-भावनांचे
मी व्यंगचित्र त्याचे साकारणार नाही ?
कविता करीत गेले तोट्यात ते बुडाले
कविता करावया मी बेरोजगार नाही
थकतील वाचणारे शोधून मौक्तिकांना
फुटके मणीच सारे, हा रत्नहार नाही
धिक्कार रोज होतो, होतो निषेध कायम
अजुनी विडंबितांचा घटला विखार नाही
'खोड्या' विडंबनाच्या करतो जरी, तरी मी
केशवसुमार नाही, केशवकुमार नाही :(
Labels: विडंबन
आमची प्रेरणा : कोण आपणहून आले
कोण आपणहून झाले, बनवले गेले किती ?
कंपुबाजीने इथे बायरन किती, शेले किती
दंग लाइन मारताना, खर्च हे कळले कधी ?
पटवण्यासाठी दिले परफ्युम किती, झेले किती
शीळ जी ऐकून खुलली तीच केवळ जाणते
चौक-चौकावर तिच्यावर जीव जडलेले किती
भेट अतिथींची टिपे अवघ्याच वस्तीची नजर
आजवर पोहे-चहा खाण्यास आलेले किती
श्वेत-अश्वेतात हल्ली रंगतो कलगी-तुरा
"लावुनी गाली चुना गोरे तुला केले किती"
"चोंबडा" म्हणुनी मतांची पिंक जी ती टाकते
नाक मुरडुन बोलते, " लुब्रे इथे मेले किती"
अमृताचे थेंब थोडेसेच गेली देउनी
पण कडू उपदेश भरलेले दिले पेले किती !
कैक नामी भ्रमर असलेल्या कवींना पाहिले
काव्य स्फुरलेले किती अन् यमक सुचलेले किती...?
बोलणे, खोड्या, तुझे झाले दफन पानावरी
गाडण्या काव्यास तुझिया लेखकू ठेले किती !
Labels: विडंबन