प्रेरणेचा स्रोत : मिल्याची मस्त गझल "अंतरातली व्यथा अंतरी जपायची"
भेट आपली अशी 'वाद'ळी असायची
आत, बाह्य अंगभर...खोल जखम व्हायची
भार केव्हढा तुझा ... श्वास चोंदवीलसा
देह कोसळायचा अन मिठी सुटायची
भांडण्यास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर तुझ्यामधे झांटिपी शिरायची
ह्या तिच्या जुन्या त्रुटी... रोज स्नान टाळते
श्वास रोख! अन्यथा... नासिका जळायची
दाखवू नकोस तू सौष्ठवास सारखे
प्रेरणा मिळायची... 'काम'ना करायची
दिवस पाहिले असे... की खरे लिहायचे
सलिल मास्तरासही चाल मग सुचायची
एक नीळकंठ तर पार्वती, सतीमधे
दोन बायकांतली मत्सरी जपायची
मी अखेर जाणले मर्म यौवना तुझे
लक्ष्य ओळखायचे... सावजे टिपायची
एक हेच साकडे खोडसाळ घातले
सोड शेवटी तरी लालसा लिहायची
Labels: विडंबन
मी बोललो न काही, तू बोलतेस सारे
ह्यालाच नवयुगाचे म्हणतात काय वारे ?
विसरू कसा, प्रिये, मी मधुचंद्र आपला तो
येतो अजून काटा, येती किती शहारे
वाटायचे, करावे तू गप्प चुंबनांनी
तू ऐकवीत बसली गीतेतले उतारे
चाले सरस्वतीचे नर्तन तुझ्या जिभेवर
अन् शब्द संपल्यावर नुसतेच हातवारे
मी नेत्रपल्लवीने 'विषया'स छेडल्यावर
बघसी वटारुनी तू संतप्त नेत्र घारे
पाणी दुज्या तळ्यांचे चाखवयास जावे
तर ठेवतेस कायम माझ्यावरी पहारे
दिसतील काय, देवा, मजला दिवस असेही
'खोड्या' तिच्या 'अरे'ला जेव्हा करेल 'का रे' ?
Labels: कविता