मी बोललो न काही, तू बोलतेस सारे
ह्यालाच नवयुगाचे म्हणतात काय वारे ?
विसरू कसा, प्रिये, मी मधुचंद्र आपला तो
येतो अजून काटा, येती किती शहारे
वाटायचे, करावे तू गप्प चुंबनांनी
तू ऐकवीत बसली गीतेतले उतारे
चाले सरस्वतीचे नर्तन तुझ्या जिभेवर
अन् शब्द संपल्यावर नुसतेच हातवारे
मी नेत्रपल्लवीने 'विषया'स छेडल्यावर
बघसी वटारुनी तू संतप्त नेत्र घारे
पाणी दुज्या तळ्यांचे चाखवयास जावे
तर ठेवतेस कायम माझ्यावरी पहारे
दिसतील काय, देवा, मजला दिवस असेही
'खोड्या' तिच्या 'अरे'ला जेव्हा करेल 'का रे' ?
Labels: कविता
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)