मूळ जमीन : मातीची दर्पोक्ती
(तात्यासाहेब, क्षमा कराल अशी आशा करतो. )

घनघोर मार्चचा पाहुनिया यरएंड
त्या तृषार्त शास्त्यांच्या हाताला कंड
उन्माद तया, अफवांचे पीक सभोती
थरथरा कापणे करदात्यांच्या हाती

ते मत्त बाबुगण गाउ लागले गीत
कोलाहल घुमला चहूकडे देशात -

करपात्र नागरिक ! आम्हाला अवमानी !
बेनामी खाती उघडुन बँकांमधुनी
त्या मूढ जनांना नच जाणीव अजूनी
आम्हांस शेवटी सर्व माहिती मिळती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

किमतीस भिडूद्या गगनाला गर्वात
ठाकुद्या महागाई दारी उन्मत्त
पोरटी असूद्या तुमची भूक्त, अशक्त
हो, तरिही घालू धाडी अर्ध्या राती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

पाहतो स्वतःचे अम्ही रूप सर्पात
'स्कृटिनि'त ओढतो सावजास विळख्यात
निर्दोष मांडुद्या शब्दांचा आकान्त
लावतो 'पेनल्टी', व्याजही अन् त्यावरती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

कित्येक बिलंदर कर चुकवुनिया गेले
कित्येक फॅक्टरीवाले जरी निसटले
कित्येक कागदी तोटा दावून गेले
स्मृति मात्र आमची दीर्घ नि तल्लख होती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

पाहून हसू ये विवरणपत्र धमाल
अन् खर्च किती तो ! आय किती लपवाल ?
शेकडो अकाउंटन्ट आणिक लाख दलाल
होतात सर्वथा लीन आमुच्या भेटी
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

धनवंत असूद्या, असुद्या दीन भिकारी
आम्हास असूद्या खाबू, भ्रष्टाचारी
समसमा वागतो सर्वांशी अधिकारी
'खात्या'त आमुच्या कसली नीति-अनीती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

'बारा'त नेउनी कराल इच्छापूर्ती
कमनीय कामिन्या चित्त प्रफुल्लित करती
लाभेल तयांची अन् कनकाची प्रीती
ते तपास, 'क्वेरी',  मिटवू होता तृप्ती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

ह्या क्षुद्र फाइली, कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
'अर्था'तच आयकर अधिकारी रममाण
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
लोकांवर चढणे खूप नवे कर अंती !

एका नटीची पत्रकाराकडे तक्रार. स्फूर्तिस्थान - सुरावटीवर तुझ्या उमटती


मुलाखतीतुन तुझ्या प्रकटती, अचुक कुणाला केव्हा पटले
नकोस छापू अशा बातम्या, तुझ्यामुळे, रे, जगा समजले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले

कैक रात्री मी धुंद जागले, आई-बाबा होते निजले
जागरणाचे ठिकाण, कारण, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तीन दिवस मी ’लेट’ जाहले, कितिदा तरि मी मोजुन थकले
’उशिरा’मागिल भाव अनामिक, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुला कळाली येणी-जाणी, ’गूज’ खोलवर केव्हा रुजले
’ब्रेकिंग’ केली ’न्युज’ तयाची, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

चित्रपटांचे क्षेत्र मनोहर, नवरी हो‌उन कितिदा सजले
मधुचंद्राच्या विवाह नंतर, तुझ्यामुळे, रे, जगा समजले

तुझ्या बातमीमुळेच माझे, नटी म्हणोनी भाव उतरले
तुझ्यामुळे, रे, जगा समजले


कविवर्य कुसुमाग्रजांची क्षमा मागून, "समिधाच सख्या या"  या त्यांच्या अप्रतिम कवितेवरून सुचलेल्या ओळी देण्याचे धार्ष्ट्य करीत आहे.

भ्रांतिष्ट कुणीसा कवी करी ही कविता
भेटते जिच्यातुनि त्याची जीवन-वनिता

तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे
कवी अखंड पाहे वाट प्रेरणेकरिता !

लडिवाळ कान्त तो ही सोडून निघाली
अन्‌ शोधित प्रियकर रानातून ढमाली
नच रम्य बांधणी, सुडौल अथवा घाट
तोंडावर तुरळक लव अंकुरुनी आली !

नव-कवितेच्या या फसव्या शब्दांखाली
ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली
वाचे न कुणी, छापे न कुणी संपादक,
"या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"

कविता न कराव्या; हट्ट अता सोडावा,
कोठून कथेपरि पैसा त्यात मिळावा ?
जात्याच भिकारी, एकच मज आकांक्षा,
ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds