प्रेरणास्रोत : गगनगिरी यांची सावली...
मी स्वतः:च्या माउलीला घाबरतो
जेव्हा मी नापास ठरतो...
माउली किरकोळ शरीराची
पण तिंबते कणीक माझ्या पाठीची...
माउलीस नाही अश्रू, माउलीस नाही दु:ख
शरीर बुकलते सारे आणि घेते वर तोंडसुख...
माउली ओरडते गुणपत्रिकेचे रकाने बघून
भोपळे बघून तिच्यावर मग आग येते माउलीतून...
येतो निरोप शिक्षिकेचा, निजे 'खोडसाळ' वर्गात मजेत
तरी स्वप्न पाहते उगाच डिस्टिंक्शन मिळण्याचे साखरझोपेत...
खोडसाळ...
प्रेरणा : मिलिंद फणसे यांची कविता निरोप . त्यांची कविता संपते त्याच्या काही वर्षांनंतरचा काळ या 'कविते'त सापडेल.
थांबा थोडे, दीर तिथे पेंगुळला नाही
जावेचाही तिरपा डोळा मिटला नाही...
कुठे संपले भांडण श्वशुरांचे सासूशी?
रंग वन्सने तोंडाचा उतरवला नाही...
चाळकऱ्यांनी कुठे लावली दारे घरची ?
आडोशाचा अजून पडदा सरला नाही...
धीर धरा हो, जरा आवरा तुमची वळवळ
चिंगी जागी आणिक बंड्या निजला नाही...
अजून काही आले नाही नळास पाणी
तशीच पडलित भांडी,ओटा धुतला नाही...
किती बोलता उच्चरवाने भलत्या गोष्टी
अर्थ नकाराचा लटक्या का कळला नाही ?
Labels: विडंबन
प्रेरणा : अजब यांची गझल रंग...
बघताना मी झालो होतो दंग
बघुन रूप तव होउ कसा निःसंग?
तू नसताना सवती त्या असतातच!
तू नसताना होउ नये बेरंग...
उठून धावू नकोस खुर्चीवरुनी...
अल्प वस्त्र तव आणिक त्यावर तंग!
रोज शिलाई पत्नीसाठी करतो;
शिवुन होइतो अजुन वाढते अंग...
का स्वप्नी 'ही' नेहमीच मज पुसते-
"कुणा संगती चालू रंग न् ढंग?"
कधी प्रतीक्षा, कधी मनीषा असते;
मनात चालू अनितेचा व्यासंग!!
इथेच असतो 'खोडसाळ' लपलेला
कवी-कुलाचा करायास रसभंग...
Labels: विडंबन
बऱ्याच दिवसानंतर चित्त यांची गझल मनोगतावर वाचावयास मिळाल्यामुळे आम्हांस वाटले बरे किती काय सांगू ? ती सुंदर गझल वाचून आम्हालाही एके काळी भेटलेले काही चेहरे आठवले.
भेटती लपून फटफटीत चेहरे किती!
सोबतीस आणती सख्यांस फत्तरे किती!
मी अजूनही दूरून चेहऱ्यास पाहतो
लाजल्याशिवाय भेटण्यास चाचरे किती!
प्रश्न हा विचारतात सेल्स गर्ल्स नेहमी
राहतात बायका अशी इथे घरे किती?
झोपड्यांत राहणे ठरेल फायद्यातले
आलिशान बांधतात त्यात टॉवरे किती!
आपले ऋणानुबंध जोडले तरी मला
घडवलेस तू उपास सांग लाजरे किती?
गोड गोड बोललीस, वाटले बरे किती
थाप त्यातली किती नि त्यातले खरे किती?
दार लावुनी उभा तुझ्यासमोर ठाकलो
अन् तुला फिकीर पाहतात सोयरे किती!
बोहल्यावरी चढायच्यात चार कन्यका
मी चढायचे अजून, हाय, उंबरे किती?
गांजतील मैफलीत डास आज, पण उद्या
चारशील त्यांस धूळ, क्षुद्र मच्छरे किती!
खोडसाळ चित्त हे किती दिसात बोलले
लाभले तुला चविष्ट काव्यतोबरे किती!
Labels: विडंबन
प्रेरणा : सुवर्णमयी यांना झालेले आभास
आभास तू पतीचा, मी शोधले कितीदा
शोधून रोज तुजला कातावले कितीदा
जुल्फे झडून गेली, कुंतल उडून गेले
टोपीस घट्ट धरुनी तू ठेवले कितीदा
लग्नात बायकोही तुज ओळखू न आली
मुंडावळ्यांत मजला गुंडाळले कितीदा
मॉडेल नवीन होते, पठ्ठा तयार होता
बाहूत घेतल्यावर ओशाळले कितीदा
घेऊन साथ फिरणे होते तुला नफ्याचे
नांदावयास नेणे तू टाळले कितीदा
होते किती जणांच्या यादीत खोडसाळा
घालून माळ तुजला पस्तावले कितीदा
Labels: विडंबन
ही रचना अजबरावांना सविनय अर्पण...
तुलाच आहे केले पाकिट अर्पण
तुझ्यामुळे पैशाची कायम चणचण...
तुझी तोफ तर अखंड चालू असते
तुझ्यामुळे हे डोके होते भणभण
वरण भात अन् जूनच भाजी आहे
अन् कढी त्यावरी बुरसटलेले शिक्रण...
काळ लोटला जरि कर्णपटल फुटल्याला
आठवणीत आहे बोंबलल्याची ठणठण...
उत्तर होते चुकलेलेच नवऱ्याचे
समजता पत्नीला करे पतीला ताडण
अजब 'खोडसाळा' सवय तुझी ही भारी
तू प्रतिभा केलीस सारी विडंबनार्पण
Labels: विडंबन
इतिहासाचार्य अनिरुद्ध१९६९ यांच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन आम्हीही इतिहास रचण्याची स्वप्ने बघू लागलो. त्याचीच परिणती खालील पुनर्लिखित इतिहासात झाली.
मीही लिहीन म्हणतो कविता जुन्या नव्याने
संदर्भ चोरलेले कळतील पण अशाने
उकरून काढले मी इतिहास, वाद सारे
झाले जिवंत सारे कंपू पुन्हा नव्याने
काव्यास आज माझ्या का ती बघून हसते
जुंपेल खास अमुची केव्हा तरी अशाने
दमलो जरा सकाळी मी वाद घालताना
सुचले नवीन मुद्दे आता नव्या दमाने
होणार हे असे मज ठाऊक काय नव्हते
बदनाम पार केले मम नाव तोतयाने
ढापू कुणाकुणाच्या ओळी मला कळेना
चाळून पाहिल्या मी कविता क्रमाक्रमाने
ओढून ताणले मी शब्दांस एव्हढे की
फाटून अर्थ सारे गेलेत त्या बळाने
नाही प्रकाशकाने छापावयास नेली
माझी भरून झाली कित्येक तावदाने
फाडून टाक त्यांना, होईल त्रास त्यांचा
वाचू नये दुज्याचे साहित्य लेखकाने
आतून येत आहे आवाज मत्सराचा
समजूत, खोडसाळा, काढू तुझी कशाने ?
Labels: विडंबन
आमची प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल ...का असे?
का अबोला, का दुरावे?...व्हा असे
दूर राहुन का झुरावे?...व्हा असे
प्रीत माझी टाळता का राजसा?
मी किती हो आतुरावे?...व्हा असे
बीज स्नेहानेच पडते, त्याविना
ते कसे हो अंकुरावे?...व्हा असे
ठेवली मी बाज सजवुन अन् तुम्ही
मागता कसले पुरावे?...व्हा असे
खोल भरले श्वास मी छातीत या
फूल हे कोणी चुरावे?...व्हा असे
खोडसाळा जर उद्या नसणार तर
आज थोडे फुरफुरावे!...व्हा असे!
Labels: विडंबन
आमची प्रेरणा : आमचे परममित्र व विडंबनव्यवसायबंधू रा. रा. केशवसुमार यांची (मोजणी)
हल्ली गझल मला का कोणीच देत नाही ?
कोणी चुकून सुद्धा जोखीम घेत नाही !
आश्वासने कवी ते देऊन कैक गेले
मी भादरेन म्हणुनी पण काव्य देत नाही
सारे विडंबनांने पोळून लांब गेले
डसलो तयां असा की जवळीच येत नाही
'धिक्कार' खास अमुचा, अभिप्राय रोज तिरके
मज मोजदाद त्यांची अजिबात येत नाही
काव्यास केशवाच्या खरपूस भाजतो तो
का लाडवास त्याचा आस्वाद येत नाही ?
मी श्वास घेतला तर दचकू नका कवींनो
मानेवरी बसाया मी भूतप्रेत नाही
केला समीक्षकांनी नाहीच पुस्तकात
उल्लेख एक माझा प्रस्तावनेत नाही
माझ्या विडंबनांचा घेऊ नकात धसका
मिश्किल झरा असे हा, हा पानशेत नाही
नाहीस खोडसाळा गणतीत तू कवींच्या
संमेलनात अथवा त्यांच्या सभेत नाही...
Labels: विडंबन
हे विडंबन नाही. पुलस्ति यांच्या जटायू या गझलेची जमीन वापरून (परवानगी न घेता! पुलस्तिजी, क्षमस्व.) वेगळ्या विषयावर केलेली रचना आहे.
का 'अटल'चे नाव घ्यावे वाटते ?
'मुखवट्या'मागे लपावे वाटते ?
एकदा "जिन्ना निधर्मी" बोललो
आजही त्यावर रडावे वाटते!
पाजतो कॉफी सिन्योराला अता
क्वॉटरोचीला भुलावे लागते
रोग गुढगीचा, तरी आहे उभा
हो, घरी 'त्या'ने बसावे वाटते!
प्रश्न माझा नागपुरला एवढा
का जटायू मज करावे वाटते?
काय माझा दोष? कसली ही सजा?
...हाच की पी.एम. बनावे वाटते?
तोच मी अन त्याच त्या रथयात्रा
का मला पुस्तक लिहावे वाटते?
मी बनावा, 'तो' न व्हावा वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?
जाणतो मतदान नाही दूर पण
ते अचानक आज व्हावे वाटते...
Labels: कविता राजकारण