आमच्या मनोगतावर सध्या 'ऋतू' भलताच बहरात आहे. वैभव जोशींनी दिलेली ओळ "ऋतू येत होते, ऋतू जात होते" घेऊन तऱ्ही* गझल रचण्यासाठी सारे रथी, महारथी सरसावले आहेत. वानगीदाखल जयन्ता५२ ह्यांच्या काव्यप्रतिभेच्या वेलीस आलेले हे सुंदर फुल पहा - "ऋतू येत होते ऋतू जात होते-५". ह्या साहित्यिक वसंत ऋतूत आमच्या खोडसाळ बांडगुळ लेखणीसही किंचित बहर आल्यास नवल नाही. जयन्तरावांपासून स्फूर्ती घेऊन आमच्या काही ओळी सादर करीत आहोत.
ऋतू येत होते, ऋतू जात होते
नवे लग्न आता जुने होत होते
जुनी तीच पत्नी, जुने ते पतीही
नवे वाद हल्ली हजारात होते
कधी थांबले ना बरसणे तिचे ते
पितर का तिचे पाणी-खात्यात होते?
तशी ती तिची ओढणी द्वाड आहे
जरा वात येता खुली बात होते !
पिसारा इथे मी कितीही फुलवला
न लांडोर येते न बरसात होते
न होकार आला तरी दु:ख नाही
नवे पाखरू दृष्टिकक्षात होते
(* - अवांतर - मराठीत ह्यास 'तरीही' गझल म्हणावे काय? आणि इंग्रजीत "me too" गझल?)
Labels: विडंबन